वायू प्रदूषण समस्या प्रस्तावना – Air pollution :

मानवी हसतक्षेपामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण अशा प्रदूषणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी वायू प्रदूषण ही समस्या अत्यंत धोकादायक असते.

जिवंत रहाण्यासाठी सजीवांना प्राणवायूची आवश्यकता असते. माणूस आहार किंवा पाण्याशिवाय अनेक दिवस जिवंत राहू शकतो मात्र हवेशिवाय 10 मिनिटेही जिवंत राहू शकत नाही. प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा हवेतील एक महत्त्वाचा घटक आहे.

हवेत ऑक्सिजनचे प्रमाण 21% असते ते 10% कमी झाल्यास लगेच मृत्यू ओढवतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वप्रथम मेंदूवर आघात होतो. यामुळे गोंधळलेली अवस्था गुंगी येणे, मृत्यू येणे असे प्रकार घडतात. विषारी दूषित वायू केवळ आपल्या आस्तित्वाने हवेतील ऑक्सिजन कमी करतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होणे, प्राणवायू विषारी होणे ही अत्यंत धोकादायक अशी समस्या ठरते.

हवेतील प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि इतर जीवसृष्टीवर होतो. त्यामुळे हवेच्या प्रदूषणाच्या समस्येकडे सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपापल्यापरीने हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे.

वायू प्रदूषण म्हणजे काय..?

जगण्यासाठी सर्वच सजीवांना प्राणवायूची गरज असते. हा प्राणवायू (ऑक्सिजन) हवेमध्ये असतो. वातावरणातील हवेमध्ये दूषित अपायकारक घटक मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होत असते. यामुळे त्या हवेची गुणवत्ता खालावते, अशी हवा सजीवांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागते यालाच वायू प्रदूषण किंवा हवेचे प्रदूषण असे म्हणतात.

हवेची गुणवत्ता ही वायू गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) नुसार तपासली जाते. ज्या हवेचा गुणवत्ता इंडेक्स 0 ते 50 दरम्यान असतो ती हवा श्वास घेण्यासाठी योग्य असते. तर 50 पुढील इंडेक्स हा हवा प्रदूषित असल्याचे सूचित करतो.

हवेतील प्रमूख घटक व त्यांचे प्रमाण –
1. नायट्रोजन 79.20 %
2. ‎ऑक्सिजन 20.60 %
3. ‎कार्बनडाय ऑक्साईड 0.20 %
4. ‎अन्य घटक – सूक्ष्म स्वरूपात असतात

वायू प्रदूषणाची कारणे (Causes) :

हवेच्या प्रदूषणास मानवच सर्वस्वी जबाबदार आहे.

  • वाढती लोकसंख्या, शहरीकरण,
  • ‎औद्योगिक विकास, कारखान्यांतून बाहेर पडणारा विषारी वायू,
  • औष्णिक वीज केंद्रामधून निघणारे धूर,
  • रासायनिक उद्योगातून बाहेर पडणारी रासायनिक घटके,
  • ‎बेसुमार वृक्षतोड,
  • ‎धूळ, कचरा पेठविणे, प्लास्टिक जाळणे, टायर जाळणे,
  • लाकडांचा जळणासाठी वापर करणे,
  • ‎अमर्यादित वाहनांचा वापर. वाहनामुळे होणारे प्रदूषण हे सर्वात जास्त प्रमाणात असते. वाहनांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणात कार्बन मोनोक्साईडचे प्रमाण दोन तृत्यांश इतके असते. तर हायड्नेकार्बन आणि नायट्न्स ऑक्साईड निम्या प्रमाणात असते.
  • ‎सुखसाधनांच्या वस्तूंचा (जसे, फ्रिज, एअरकंडिशनर इत्यादी) अतिवापर,
  • ‎शेतामध्ये कीटकनाशके, जंतूनाशके यांचे सोडलेले फवारे,
  • ‎अणुबाँब सारखे शास्त्रीय प्रयोग ह्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.
    याशिवाय जंगलातील वणवा, ज्वालामुखीतून निघणारी राख व इतर घातक वायू यासारख्या नैसर्गिक कारणांमुळेही हवा प्रदूषित होत असते.

हवा प्रदूषणाचे परिणाम :

हवेशिवाय मनुष्यप्राणी जिवंत राहूच शकत नाही. कारण जगण्यासाठी हवेच्या श्वसनाची क्रिया सतत चालू राहावी लागते. मात्र श्वसनावाटे शरीरात येणारी हवाच जर प्रदूषित असेल तर? त्याचा निश्चितचं वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ लागतो.

विविध प्रदूषक घटकांचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम –
प्रदूषित हवेमुळे संपूर्ण सजीवसृष्टीवर परिणाम होतो.
प्रदूषणामुळे येत्या काळात कोलकाता, दिल्ली आणि त्या खालोखाल मुंबईत वायू प्रदूषणामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण वाढेल, असे सर्वेक्षणात आढळले आहे.

वायु प्रदूषणामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्येने, श्वसन क्रियेत अडचणी येणे, दमा, खोकला यांसारखे श्वसन व हृदयासंबंधीची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. श्वसन मार्ग आणि फुफ्फूसाचे विविध रोग होतात. त्याच प्रमाणे दमा, क्रॅन्सर, बेशुध्द पडणे, घसा खवखवणे, डोळयातुन पाणी येणे इ. विकार होतात. व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते आणि व्यक्तीचे शरीर सगळया रोगांना सहज बळी पडते. विविध प्रदूषणामुळे व्यक्तीच्या सगळया शरीर आणि मनावर मोठा परिणाम होत असतो. हा परिणाम स्पष्ट दिसत नाही तर कित्येक वर्षे हळूहळू होत असतो आणि त्याचे धोके खूप उशिरा लक्षात येतात.

वनस्पतींवरही विषारी वायूचा गंभीर परिणाम होतो. झाडांची वाढ खुटंणे, पाने वाळणे, वाकणे, झाड मरून जाणे किंवा उत्पन्न कमी येणे इत्यादी परिणाम होतात.

हवा प्रदूषणामुळे ऐतिहासिक वास्तूंचेही (ताजमहाल इ.) नुकसान होते, रंग बदलणे इत्यादी गोष्टी घडू शकतात. दूषित हवेमुळे वातावरणातील तापमान वाढते व त्याचा परिणाम हवामानावर तसेच पावसावर होतो. आम्लवृष्टी होते.

याशिवाय वाढत्या कार्बन डायऑक्साइडमुळे पृथ्वीच्या ओझोन या वायू थराचे प्रमाणही कमी होत आहे. ओझोन थरामुळे सूर्याची जास्त प्रखर किरणे पृथ्वीवर येण्यापासून रक्षण होते. मात्र ओझोनचा थर पातळ होत असल्याने सूर्याची प्रखर किरणे पृथ्वीवर येत आहेत त्यामुळेच जागतिक तापमानवाढीची समस्याही आजकाल भेडसावत आहे.

वायू प्रदूषण उपाययोजना :

  • वृक्ष लागवड करून झाडांचे संवर्धन करावे,
  • वृक्षतोड, वणवा यासारख्या संकटापासून झाडे वाचवावीत,
  • पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर मर्यादित करावा.
  • इलेक्ट्रिक आणि CNG वाहनांचा वापर करावा,
  • सायकालचा वापर करावा,
  • सार्वजनिक वाहनांचा सर्वांनी मोठ्या प्रमाणात वापर करावा,
  • प्रदूषण कमी करण्यासाठी उद्योग प्रकल्प क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बंधनकारक करावे,
  • सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे,
  • वाढत्या लोकसंख्येला आळा घालावा,
  • उघड्यावर कचरा जाळणे टाळावे,
  • लाकडे, प्लास्टिक, कपडे किंवा रबर जाळणे टाळावे,

अशा उपायांचा अवलंब करून आपण वायू प्रदूषणाची समस्या दूर करू शकतो.

हे सुद्धा वाचा..
जलप्रदूषण विषयी माहिती जाणून घ्या.

Read Marathi language article about Air pollution problem causes, Health Effects and Solutions. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.