निरोगी आरोग्याचे महत्त्व :

चांगले आरोग्य हिचं खरी संपत्ती असते. त्यामुळेच ‘आरोग्य धनसंपदा’ असे आरोग्याच्या बाबतीत म्हंटले जाते. मात्र आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात सर्वांचेच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास पैसा, संपत्ती मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण आपले आरोग्य पणाला लावत आहोत.

निरोगी आरोग्य म्हणजे काय..?

निरोगी आरोग्याची व्याख्या खूपच व्यापक अशी आहे. शरीर आणि मन दोन्हीही व्यवस्थित असणे याला ‘निरोगी आरोग्य’ असे म्हणता येईल. जी व्यक्ती आपली सामाजिक जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यासाठी शरीर व मनाने सदृढ असते, त्या व्यक्तीस निरोगी व्यक्ती म्हणतात.

निरोगी आरोग्याचे हे आहेत फायदे :

1) कार्यक्षमता वाढते –
शरीर निरोगी असल्यास व्यक्तीची कार्यक्षमता वाढून आपापल्या क्षेत्रात प्रगती होण्यास मदत होते. यांमुळे शिक्षण, करीअर, व्यवसाय व्यवस्थित होऊन आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यास मदत होते.

2) रोगप्रतिकारक क्षमता वाढते –
शरीर निरोगी असल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्यामुळे ताप, सर्दी, खोकला असे आजार सहजासहजी होत नाहीत.

3) चुकीच्या जीवनशैलीचे आजार होत नाहीत –
निरोगी आरोग्यामुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा यासारखे अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे आजार होत नाहीत.

4) मानसिक स्वास्थ्य चांगले राहते –
मानसिक स्वास्थ्य चांगले राहिल्याने मनावर ताबा राहतो. त्यामुळे हिंसा, राग, भांडणे, डिप्रेशन, आत्महत्येचा विचार यासारखे मानसिक विकार होत नाहीत.

5) कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते –
आजारी असल्यास कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडते. आजारी पडल्यास वेळ आणि पैसा खर्च होतो. घरातील प्रत्येकजण निरोगी असल्यास संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे प्रत्येकजण आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडतो.

6) औषध उपचारांचा खर्च कमी येतो –
आजारी असल्यास महागडे वैद्यकीय उपचार, औषधे व नानाविध तपासण्या यांचा भरमसाठ खर्च येत असतो. त्यामुळे निरोगी राहिल्यास औषध उपचार यांवरील खर्च कमी होतो.

7) सामाजिक आरोग्य राखले जाते –
निरोगी जीवनशैली रुजल्यामुळे सामाजिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होतो. सक्षम समाजामुळे संपूर्ण देशाचेचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. निरोगी जनतेकडून देशाच्या सर्वच क्षेत्रात प्रगती होऊ लागते.

आरोग्य चांगले राहण्यासाठी हे करावे उपाय :

चांगल्या आरोग्यासाठी हेल्दी जीवनशैलीचा अंगीकार करणे गरजेचे असते. योग्य आहार, व्यायाम, स्वच्छता आणि वर्तणूक या चार बाबींचे पालन केल्यास निरोगी जीवन जगणे सहज शक्य असते.

योग्य आहार घ्यावा –
पोषकघटकांनी परिपूर्ण आणि संतुलित आहार घ्यावा. स्वतःची शारीरिक क्षमता विचारात घेऊन आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, धान्ये, कडधान्ये, सुखामेवा, विविध फळे, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश असावा. दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

सतत तेलकट पदार्थ, चिप्स, स्नॅक्स, बिस्किटे, जंकफूड, फास्टफूड खाणे टाळावेत. बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉपी, कोल्ड्रिंक्स यांचे प्रमाणही कमी करावे.

व्यसनांपासून दूर राहावे –
दारू, अल्कोहोल, सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा सर्वच व्यसनांनी आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी अशा व्यसनांपासून दूर राहावे.

स्वच्छता राखावी –
स्वच्छता किती महत्वाची आहे ते आपण सर्वांनीच ‘कोरोना’मध्ये अनुभवले आहे.अस्वच्छतेमुळे अतिसार, गॅस्ट्रो, उलट्या, डेंग्यू, मलेरिया असे असंख्य साथीचे रोग होत असतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्या. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

नियमित व्यायाम करावा –
नियमित व्यायाम केल्याने शरीर सदृढ बनण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहते. पर्यायाने निरोगी आरोग्य राहण्यास मदत होते. त्यामुळे दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. व्यायामामध्ये जोरात चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग, दोरीउड्या, मैदानी खेळ यांचा समावेश करू शकता. व्यायामाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पुरेशी विश्रांती घ्यावी –
कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कामाबारोबच विश्रांतीही तितकीच महत्त्वाची आहे. दररोज पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. मानसिक तणाव घेऊ नये. तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासावा, मनोरंजनाचा आनंद घ्यावा, फिरायला जावे किंवा ध्यान धारणा करावी.

वर्तणूक सुधारा –
सुदृढ व निरोगी शरीर बनवण्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्या. आरोग्यासाठी चांगले काय आहे, वाईट काय आहे हे ठरवून स्वतःची वर्तणूक ठेवावी. व्यायाम न करता सतत फास्टफूड खात बसणे किंवा व्यसनांच्या आहारी जाणे, मानसिक ताण घेणे किंवा भरधाव वेगाने गाडी चालवून स्वतःचे व दुसऱ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य की अयोग्य हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे व त्यानुसार स्वतःच्या वर्तणुकीत योग्य तो बदल करणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा – रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Medically Reviewed By - Dr. Satish Upalkar
Dr. Satish Upalkar is a Healthcare counsultant. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra University of Health Science, Nashik and is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai.
Qualification: Bachelor of Ayurveda Medicine and Surgery (B.A.M.S.)
Medical Council Registration number: I-72800-A
Contact details -[email protected]
Follow - LinkedIn | Facebook | Twitter | YouTube